Ad will apear here
Next
सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडिक
स्वराज्य उभारण्याच्या कामी ज्या असंख्य वीरांनी पराक्रम गाजविला, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडिक. २९ सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दल ही माहिती...
.......
हिंदवी स्वराज्य साकारण्यासाठी सोळाव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत देव, देश आणि धर्मासाठी झुंजलेले आणि राजेभोसले घराण्याशी एकनिष्ठ राहिलेले एक शूर मराठा सरदार घराणे म्हणजे राजेमहाडीक घराणे. हे श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खूप प्रसिद्ध होते. सोळाव्या शतकात हे महाडला आले. महाडवरून त्यांना राजेमहाडिक असे आडनाव पडले.
 
त्यांचे महापुरुष कृष्णाजीराजे १६१४ साली युसूफ आदिलशहाच्या लुटालुटीत मरण पावले. त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती. नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरुवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कान्होजी यांना ही मुकादमकी मिळाली. कान्होजी १६५०मध्ये युद्धात मरण पावले. त्यांचे पुत्र परसोजी हे शहाजीराजांना कर्नाटकात मदत करत असताना मरण पावले. त्यांचा मुलगा हरजीराजे राजेमहाडिक यांच्यावर शहाजीराजांचे चांगलेच लक्ष होते. 

हरजीराजे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते. जी मोहीम छत्रपती देतील, ती मोहीम यशस्वी करूनच हरजीराजे येत होते. छत्रपती शिवरायांनी हरजीराजे यांच्या कर्नाटकातील कामगिरीवर खुश होऊन सोन्याची जेजुरी गडावर हरजीराजांना ‘राजेशाही’ हा किताब सन्मानार्थ देऊ केला. राज्याचा महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मुघलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांना आहे. अशा कर्तबगार राजेमहाडिक घराण्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटकसह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या झंझावाती आक्रमणापासून वाचवला. हरजीराजेंनी त्या वेळी जिंजी व वेल्लोर, मद्रास, म्हैसूर, अर्काट, बंगळूर आदी प्रांत म्हणजे संपूर्ण कर्नाटक व तमिळनाडू जिंजीच्या आधिपत्याखाली आणले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज १६८९मध्ये जिंजीस आले. तेथे राजधानी घोषित करून तेथूनच त्यांनी काही काळ राज्यकारभार केला. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता; मात्र हरजीराजे नेहमी त्याच्या आड आले. 

दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशा वेळी हरजीराजे यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवला, ही त्यांची कामगिरी अद्वितीयच म्हणावी लागेल. त्यांच्या शूरवीरतेच्या गुणामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी अंबिकाबाई यांचा हात विश्वासाने सन १६६८मध्ये श्रीमंत हरजीराजे यांच्या हाती दिला. हा विवाह राजगडावर झाला होता. पुढे शिवरायांच्या मृत्यूनंतरही हरजीराजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर इमानाने वागले. दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी त्यांच्याकडे ठेवली होती. ती संभाजीराजेंनीही परत त्यांच्याकडेच कायम ठेवली. हरजीराजे यांनी पराक्रमामुळे छत्रपतींचे मन जिंकून घेतले व संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी पराक्रम गाजवले. 

पुढे हरजीराजे कांचीवर (कर्नाटक प्रांत) चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांचीही नमली व हरजीराजे महाडिक यांनी कांचीही जिंकून घेतली. संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य, पराक्रम गाजवले. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखानाशी लढता लढता २९ सप्टेंबर १६८९ रोजी हरजीराजे जिंजी येथे तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले. 

पुढे हरजीराजे महाडिक यांचे पुत्र शंकराजी महाडिक यांच्याशी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली मुलगी भवानीबाई यांचे लग्न लावून दिले. १७०९मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी भवानीबाई व शंकराजी राजेमहाडिक यांना तारळे महालाअंतर्गत २४ गावे व ७२ वाड्यांची पाचही वतनाची सनद करून दिली. सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजीराजे तारळ्यात आले. त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहत केली होती. अशा वेळी हनगोजी काटे-देशमुख, सिदोजी, विठोजी साळवे-देशमुख, देशपांडे, मुकादम, कुलकर्णी, शेटे, महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईंना साकडे घातले. त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजे यांनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्तावित करून विस्कटलेली घडी बसवली. 

धाकट्या शाहूराजांजवळ दुर्गाजीराजे महाडिक व कुशाबाराजे महाडिक हे सरदार होते. कान्होजीराजे महाडिक, परसोजी राजेमहाडिक, हरजीराजे महाडिक यांनी मराठेशाहीत आपले पराक्रम गाजवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर केले. तारळ्यात या पराक्रमाच्या अनेक पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. आजही राजेमहाडिक बंधूंचे आठ वाडे मोठ्या दिमाखात उभे असून, त्यात आजची राजेमहाडिक घराण्यातील पुढची पिढी नांदते आहे. 
अशा ह्या रणमर्दाला स्मृतिदिनानिमित्त त्रिवार मुजरा!!!

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर

(इतिहास अभ्यासक, पुणे)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HWTWCQ
Similar Posts
शिवपत्नी महाराणी सईबाई पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
जिवाजी महाले स्वराज्याची धुरा ज्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन वेळप्रसंगी मृत्यूलाही जे सामोरे गेले, अशा अनेक मावळ्यांच्या कर्तृत्वातून शिवरायांनी भूमिपुत्रांचे स्वराज्य उभे केले. त्यापैकीच एक वीर योद्धा म्हणजे शूरवीर जिवाजी महाले होय. नऊ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन. .....
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्माला आलेले संभाजीराजे हे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती. २० डिसेंबर हा त्यांच्या स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी...
स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language